
India Pakistan War । भारतीय सीमेजवळ पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने आपल्या लष्कराच्या हालचाली वाढवल्याने भारत सरकार आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पाकिस्तानकडून सातत्याने भडकावू आणि उकसवणाऱ्या कारवाया सुरू आहेत, ज्यामुळे सीमेवर तणाव वाढण्याची चिन्हं आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
दिल्लीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी या घडामोडींवर अधिकृत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “पाकिस्तान वारंवार अशा हालचाली करत आहे ज्या केवळ तणाव वाढवण्याच्या हेतूने केल्या जात आहेत. भारताने संयम बाळगला आहे.
याच पत्रकार परिषदेत भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकारी मेजर जनरल सोफिया कुरेशी यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केलं की पाकिस्तानने पश्चिम सीमेवर लष्करी हालचाली वाढवल्या आहेत. त्यांनी सांगितलं की पाक लष्कराने भारतीय हवाई तळं लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सैन्याने त्यांचा हल्ला अयशस्वी केला. यावेळी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं, लढाऊ विमाने आणि लॉइटरिंग म्युनिशन वापरण्यात आले, मात्र भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने सर्व धोके निष्प्रभ ठरवले.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून देशभरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अलर्ट जारी करण्यात आला आहे. लष्कर सतर्क असून, नागरिकांना कोणतीही अफवा न पसरवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय सैन्याने स्पष्ट सांगितले आहे की, भारत युद्ध टाळू इच्छितो, पण जर कोणी देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करत असेल, तर त्याला कडक प्रत्युत्तर दिले जाईल.