Amol Kolhe । शिरूर मतदार संघात उमेदवार उभा करणार आणि तो निवडून आणणार असं वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. त्यानंतर राज्याच्या राजकारणात शिरूर मतदार संघ चांगलाच चर्चेत आला आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना लोकसभा निवडणुकीत टक्कर देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार आढळराव पाटील (Adharao Patil) इच्छुक असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यावरून आता अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (Amol Kolhe On Adharao Patil )
आढळराव पाटील गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत अशी जोरदार टीका अमोल कोल्हे यांनी केली आहे. आज पुण्यातून राष्ट्रवादीच्या शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले अमोल कोल्हे?
अमोल कोल्हे म्हणाले, “आढळराव पाटील हे गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. ते एक वयस्कर नेते असून त्यांचा डिजिटल जीवनाशी काही संबंध नाही. त्यामुळे त्यांना कोणीतरी माझे सोशल मीडिया पेज दाखवावेत माझ्या सर्व कामांची माहिती त्या ठिकाणी आहे”. अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
आढळराव पाटील काय म्हणाले होते?
जनता मागच्या पाच वर्षापासून आक्रोश करत होती मात्र तेव्हा कोणीही जनतेकडे पाहिले नाही. सध्या निवडणुका आल्या आहेत त्यामुळे आक्रोश यात्रा काढल्या जात आहेत. अशी टीका आढळराव पाटील यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला अमोल कोल्हे यांनी प्रतिउत्तर देत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.