
Sanjay Raut । काल झालेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर देशात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय संघाने पाकिस्तानचा सहज पराभव करत विजय मिळवला असला, तरी या सामन्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर थेट आणि गंभीर आरोप केले आहेत. “हा सामना खेळायलाच नको होता, पण सरकारच्या दबावामुळे खेळवण्यात आला,” असा दावा त्यांनी केला आहे.
राऊत म्हणाले की, “भारतीय संघालाही हा सामना खेळायचा नव्हता. मात्र सरकारने दबाव टाकून सामना खेळवला. सुनील गावस्कर यांनीही हेच सांगितले आहे.” त्यांनी हा सामना ‘फिक्सिंग’ असल्याचा आरोप करत सांगितले की, “२५ हजार कोटी रुपये पाकिस्तानमध्ये गेले आहेत, जे भारताविरोधात वापरले जातील. दीड लाख कोटींचा जुगार या सामन्यावर लागला होता.”
Havaman Andaj । नागरिकांनो सावधान! महाराष्ट्रात पावसाचा मोठा कहर; पुढील काही तास अत्यंत धोक्याचे
यासोबतच राऊत यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. “ज्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय मदत रोखावी, यासाठी आपण प्रयत्न करत होतो, त्याच पाकिस्तानला आपण सामन्याद्वारे कमाईची संधी दिली,” असे ते म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधत म्हटले, “तुम्ही शेकहँड केला नाही असं म्हणताय, पण सामना तर खेळलात ना? आधी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणं बंद करा.”
दरम्यान, अनेक संघटनांनी या सामन्याला विरोध केला होता. ‘उबाठा’ गटाने आंदोलने करत सामन्याच्या विरोधात आवाज उठवला होता. नुकत्याच झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर अशा प्रकारचा सामना खेळणे गैर असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.
या सर्व घडामोडींनी भारत-पाकिस्तान सामन्यावरून पुन्हा एकदा राजकारण पेटले असून, सामन्याआड आर्थिक आणि राजकीय हितसंबंध किती खोलवर आहेत, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.