Amol Kolhe । शिरूर लोकसभा मतदारसंघावरून (Shirur Lok Sabha Constituency) अजित पवार (Ajit Pawar) आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यात वाद होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. शिरूर मतदारसंघात मी माझा तगडा उमेदवार उभा करणार आणि तो निवडूनच आणणार असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यां नी केले होते, यानंतर अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका देखील केली होती. अजित पवारांच्या टीकेला अमोल कोल्हे यांनी देखील प्रतिउत्तर दिले आहे. आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
“माझ्यावर टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत”, अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात दोन उपमुख्यमंत्री दोघेही ताकतीचे नेते आहेत. मग हे नेते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रात का जात नाहीत? असा थेट सवाल अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.
शिवस्वराज्य यात्रे सारखाच शेतकरी आक्रोश मोर्चात उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र यामध्ये काही नेत्यांची कमी जाणवत असल्याचे भावनिक वक्तव्य देखील अमोल कोल्हे यांनी केले आहे. शिवस्वराज्य यात्रेत अमोल कोल्हेंसोबत अजित पवार हे शेवटपर्यंत होते. मात्र आज जो शेतकरी आक्रोश मोर्चा काढला आहे या मोर्चातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना अजित पवारांची कमी जाणवत असल्याचे देखील अमोल कोल्हे यांनी यावेळी म्हटले आहे.