
मुंबई : शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर राजकीय वातावरणात गदारोळ सुरूच आहे. उद्धव ठाकरेंकडून (Uddhav Thackeray) सतत बंडखोर आमदारांवर गद्दार म्हणत टीका करण्यात येत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर उदय सामंतांनी (Uday Samant) हल्लेखोरांना इशारा दिलाय.
हल्लेखोरांना इशारा देताना उदय सामंत म्हणाले, “ज्या ठिकाणी माझ्यावर हल्ला झाला त्याच ठिकाणी येणाऱ्या १५ दिवसात सभा घेणार. एवढेच नाहीतर ज्यांच्यामध्ये दम आहे त्यांनी केसालाही धक्का लावून दाखवावा”, असा इशाराही त्यांनी हल्लेखोरांना दिलाय. रत्नागिरीमध्ये दहीहंडी स्पर्धेचेच्या कार्यक्रमात मंत्री उदय सामंत सहभागी झाले होते. यावेळी सामंत यांनी विरोधक आणि खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
दरम्यान, मागच्या काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एका कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उदय सामंतांनी हजेरी लावली होती. यावेळी उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला करून गाडीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता पुन्हा त्या हल्ल्याची आठवण करत सामंतांनी हल्लेखोरांना इशारा दिलाय.