
Satyapal Malik । जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल आणि थेट भाष्यांमुळे चर्चेत राहिलेले सत्यपाल मलिक यांचं मंगळवारी दिल्लीतील लष्करी रुग्णालयात निधन झालं. ७९ वर्षीय मलिक यांच्यावर काही महिन्यांपासून मूत्रपिंडाच्या विकारांसाठी उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत असून अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सत्यपाल मलिक यांचा राजकीय प्रवास अत्यंत गतिमान आणि रंगतदार होता. समाजवादी पक्षातून आपली कारकीर्द सुरू करत त्यांनी नंतर काँग्रेस आणि भाजपसारख्या प्रमुख पक्षांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. राज्यपाल म्हणून त्यांनी गोवा, मेघालय, ओडिशा आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या. विशेषतः कलम ३७० रद्द होण्याच्या संवेदनशील काळात जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून ते केंद्रस्थानी होते.
मलिक यांचं व्यक्तिमत्त्व नेहमीच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखलं गेलं. त्यांनी अनेकदा सत्ताधाऱ्यांविरोधात थेट वक्तव्य केल्याने वाद आणि चर्चेचा विषय ठरला. पुलवामा हल्ल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारवर केलेले आरोप विशेष गाजले. जवानांना बसने पाठवण्याचा निर्णय चुकीचा होता, असा ठपका त्यांनी लावला होता. यामुळे ते देशभर चर्चेत आले होते.
