
Sanjay Gaikwad | आमदार निवासातील कँटीनमध्ये मिळालेल्या निकृष्ट जेवणावरून निर्माण झालेल्या वादानंतर शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी आपली बाजू स्पष्ट करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘‘मी जे केलं, ते माझ्या शैलीप्रमाणे केलं आणि त्याबाबत मला कोणताही पश्चाताप नाही,’’ असं म्हणत त्यांनी आपल्या वर्तनाचं समर्थन केलं.
मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर गायकवाड यांनी सांगितलं की, त्यांनी डाळ, भात आणि चपातीची ऑर्डर दिली होती. परंतु जेवण सडलेलं असल्याने दुसऱ्याच घासावर त्यांना उलटी झाली. त्यानंतर ते थेट कँटीनमध्ये गेले आणि कर्मचाऱ्याला कारण विचारलं. ‘‘मी सुरुवातीला त्याला समजावलं, पण त्याने ऐकलं नाही. त्यामुळे मला ‘शिवसेना स्टाईल’मध्ये उत्तर द्यावं लागलं,’’ असं त्यांनी ठासून सांगितलं.
गायकवाड यांनी केवळ एका घटनेवर नाही तर कँटीनमधील संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ‘‘किचन अस्वच्छ आहे, उंदीर फिरतात, आणि तिथला कंत्राटदार गेल्या ३५ वर्षांपासून निकृष्ट अन्न देत आहे. ही लढाई केवळ माझी नाही, सगळ्यांनीच आवाज उठवला पाहिजे,’’ असा संदेश त्यांनी दिला.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विधिमंडळातही यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्याची तयारी दर्शवली आहे. ‘‘हे फक्त एका कर्मचाऱ्याचे प्रकरण नाही, ही एक विषारी अन्नसाखळी आहे. जर अन्न तपासणीचे रिपोर्ट वेळेवर येत नसतील, तर सामान्य जनतेपर्यंतही हेच अन्न पोहोचत असेल,’’ असा गंभीर आरोप करत त्यांनी या समस्येच्या मुळावर प्रहार करण्याचा निर्धार व्यक्त केला.