
मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) काल त्यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. बरेच दिवस रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार काल राजभवनर या ठिकाणी पार पडला आहे. शिंदे गटातून नऊजण आणि भाजपातून नऊजण असे एकूण १८ मंत्र्यांनी या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाच्या संजय राठोड (Sanjay Rathod) यांनीही शपथ घेतली. या शपथविधीनंतर रोहित पवारांनी भाजपाला टोला लगावला आहे.
रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “राठोड महाविकास आघाडीत होते त्यावेळी विरोधी पक्षाचे नेते त्यांच्या विरोधात बोलले. त्याचबरोबर टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांचं नाव आलेलं आहे. विरोधात असताना तुम्ही टीका करता. पण, सत्तेत आल्यावर तुमची भूमिका बदलत असेल तर लोक पाहत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान,भाजपमधून गिरीश महाजन ,चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे , राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा या मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. तर शिंदे गटातील तानाजी सावंत , उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार , दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड , गुलाबराव पाटील या नेत्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. दरम्यान, राहिलेला मंत्रिमंडळाचा विस्तार देखील हळूहळू करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.