
पुणे लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध खलबते सुरू आहेत. ही पोटनिवडणूक लागली तर महाविकास आघाडी कडून कोणत्या पक्षाचा उमेदवार उभा राहणार ? हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) , काँग्रेसचे नेते मोहन जोशी (Mohan Joshi) यांच्यात वाद पेटला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या वादात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी देखील उडी घेतली आहे.
” पुण्याची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. ज्या पक्षाची जिथे जास्त ताकद आहे. तिथे त्या पक्षाच्या उमेदवाराला तिकीट द्यायचं. ताकद जास्त म्हणजे वजन करायचे का? तर नाही…मागील निवडणुकीत ज्यांना जास्त मते त्यांची ताकद जास्त असे समजता येईल. आमच्या मित्र पक्षांना बोलण्याचा अधिकार आहे. आमच्या मित्र पक्षाला शुभेच्छा! ” असे अजित पवार म्हणाले आहेत.
२२ हजारांचा LG Smart TV मिळणार फक्त १३ हजारांमध्ये, पाहा धमाकेदार ऑफर
यावर उत्तर देताना काँग्रेसचे नेते मोहन जोशी म्हणाले आहेत की, ” पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाची ताकद जास्त आहे. तसेच पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस पोटनिवडणूक लढवणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 4 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार काही हजार मतांनी पराभूत झाले आहेत. त्यावरुन काँग्रेसचे वर्चस्व दिसून येते ! “
दरम्यान ” कोणाची कुठे जास्त ताकद आहे, हे सर्व पक्ष मिळवून ठरवतील. तिन्ही पक्षांची बैठक होईल, त्यामध्ये लोकसभेच्या जागेचा निर्णय घेण्यात येईल, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे अगामी निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीत वाद सुरू असल्याचे उघड झाले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक कोणते वळण घेणार ? हे पाहण्यासारखे असणार आहे.