
Politics News । राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांच्याविषयी वापरलेल्या आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीवरील भाषेमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत संतापाची लाट उसळली आहे.
पडळकर यांनी जयंत पाटील यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यात केवळ त्यांचा नव्हे, तर त्यांच्या वडिलांचा देखील अवमान केला. “जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद…” अशा स्वरूपाचे वक्तव्य त्यांनी केल्याने या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर राष्ट्रवादी पवार गटात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून आपली नाराजी व्यक्त केली. “अशी टीका करणं योग्य नाही. त्यामुळे बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवरा. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही,” अशा ठाम शब्दांत पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सुनावलं.
जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेमुळे राजकीय वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली असून, या प्रकरणात आता मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.