Site icon e लोकहित | Marathi News

Mumbai Rain । मुंबईत पुन्हा 26 जुलैची आठवण? पुढील 48 तास धोक्याचे; पावसामागचं वैज्ञानिक कारण समोर

Rain Update

Mumbai Rain । मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला गेला असून पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट तर घाटमाथ्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. परिणामी नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घातले आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसले असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

पावसाचा अचानक वाढलेला जोर नेमका का? यावर पुणे वेधशाळेच्या हवामान शास्त्रज्ञांनी स्पष्टीकरण दिले आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून वारे सक्रिय झाले असून, त्यामुळे एक द्रोणीय रेषा तयार झाली आहे. ही रेषा उत्तर कोकणापासून सुरू होऊन केरळपर्यंत जाते. याच कारणामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस कोसळत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस कोकण व घाटमाथ्यांसाठी अत्यंत निर्णायक असतील. मध्य महाराष्ट्रातील समतल भागांमध्ये ऑरेंज अलर्ट असून, त्यानंतर यलो अलर्ट दिला जाणार आहे. मराठवाडा व विदर्भातही आज ऑरेंज अलर्ट असून, उद्यापासून पावसाचा जोर थोडा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देऊन पूरस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाला सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Spread the love
Exit mobile version