
Jayant Patil । महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक धक्कादायक घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ आणि मुरब्बी नेते जयंत पाटील यांनी अचानकपणे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून, यासंबंधी अधिकृत घोषणा पक्षाकडून करण्यात आली आहे.
Sanjay Gaikwad | “त्याबाबत मला कोणताही पश्चाताप नाही…”, संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य
जयंत पाटील हे गेली जवळपास दोन दशके राष्ट्रवादीच्या नेतृत्वात अग्रभागी होते. त्यांनी अनेक निवडणुकांत पक्षाला दिशा दिली, संकटे पेलली आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोबत घेत पक्ष मजबूत केला. मात्र, अचानक त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा बदल घडवून आणल्याचे बोलले जात आहे.
पक्षाच्या आतील सूत्रांच्या माहितीनुसार, जयंत पाटील यांनी स्वतःहून राजीनाम्याचा निर्णय घेतला. नव्या दमाचे नेतृत्व तयार व्हावे, संघटनेत नवीन उर्जा यावी यासाठी त्यांनी पदातून माघार घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या या निर्णयामागे कुठलाही दबाव नसल्याचेही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जयंत पाटलांच्या जागी आता शशिकांत शिंदे यांच्याकडे पक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिंदे हे साताऱ्याचे माजी आमदार असून, त्यांनी तीन वेळा निवडून येत राजकीय ताकद सिद्ध केलेली आहे. शरद पवार यांच्या विश्वासू नेत्यात त्यांची गणना होते. ग्रामीण भागातील जनसंपर्क, संयमी बोलणे आणि संघटनेवरची पकड ही त्यांची खास वैशिष्ट्यं आहेत.
ही नियुक्ती ही केवळ औपचारिक नसून, येत्या निवडणुकांच्या रणनीतीचा भाग असल्याचे मानले जात आहे. पवार गटाला ग्रामीण भागात अधिक बळ देण्यासाठी आणि नव्या नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
जयंत पाटील यांनी आपल्या निरोप संदेशात कार्यकर्त्यांचे, पवार साहेबांचे आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. “पक्षासाठी मी नेहमीच उपलब्ध असेन, ही जबाबदारी दिली होती, ती पार पाडली. आता नवीन नेतृत्वाला संधी देणे गरजेचे वाटले,” असे त्यांनी म्हटले.