
Hiradgaon News । श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव गावात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. खरीप हंगामात मेहनतीने उगम पावलेली पिके अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्यात गेली असून कांदा, कपाशी, सोयाबीन, आणि तुर या महत्त्वाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हिरडगाव हे तालुक्यात राजकीयदृष्ट्या तसेच सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे गाव असून या भागातील बहुतांश नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी आशेने शेतीची कामे केली. अनेक शेतकऱ्यांनी यंदा पीक उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक पद्धती वापरल्या. सप्टेंबर महिन्याच्या आलेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात गेल्या.
पिकांचे झालेले नुकसान पाहता प्रशासनाने तात्काळ हालचाली सुरू केल्या असून आज पंचनाम्याचे काम करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच विद्याताई बनकर, उपसरपंच अमोल दरेकर, ग्रामविकास अधिकारी भानुसे मॅडम आणि तलाठी गोरे भाऊसाहेब यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. विविध शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानाची नोंद घेण्यात आली.
स्थानिक शेतकरी यामध्ये फारच निराश झाले असून शासनाने नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी ते करत आहेत. काही ठिकाणी पिके पूर्णतः नष्ट झाली असून शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. नुकसानीचे प्रमाण जास्त असल्यामुळे अनेक कुटुंबांच्या उपजीविकेवर त्याचा परिणाम होणार आहे. अशा परिस्थितीत, शासनाने वेळीच मदतीचा हात दिल्यास शेतकरी पुन्हा नव्याने उभे राहू शकतील.