
दिल्ली : विंडीजकडून टीम इंडियासाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) डावाच्या दुसऱ्याच षटकात पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर लाखो भारतीय चाहत्यांना त्याची काळजी वाटू लागली होती. पण आता आनंदाची बातमी समोर येत आहे. रोहितला शेवटच्या दोन टी-२० सामन्यांसाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे.
माहितीनुसार, रोहित शर्मा त्याच्या पाठीच्या ताणातून पूर्णपणे बरा झाला आहे व तो एकदम तंदुरुस्त आहे. रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड लवकरच मियामीमध्ये उर्वरित संघात सामील होतील. द्रविड, रोहितसह काही खेळाडू व्हिसासाठी गयानामध्ये मुलाखतीसाठी गेले होते.
अलीकडेचं दोन्ही सामन्यांसाठी भारतीय खेळाडूंना व्हिसा मंजूर झाला नव्हता. आणि फ्लोरिडातील सामने एकदा रद्द केले जाऊ शकतात अशी चिंता होती. मात्र, परिस्थिती इथपर्यंत पोहोचली नाही आणि आता व्हिसाचा प्रश्न सुटल्याने रोहितही फिट झाला आहे. आणि चौथ्या सामन्यातच विंडीजला पराभूत करून भारत मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी निश्चित करेल अशी आशा सर्व चाहत्यांना आहे. भारतीय संघ शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी सलग दोन सामने खेळणार आहे.