
बिहार : महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत असून बिहारमधील राजकारणात सुद्धा सध्या उलथापालथ चालू आहे. काहीच वेळापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर, ते आरजेडीसोबत मिळून लवकरात लवकर नवीन सरकार स्थापन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे बिहारमध्ये सत्तांतर होणार हे आता निश्चित झालं आहे.
माहितीनुसार, तेजस्वी यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यास सहमती दर्शवली आहे. त्याचबरोबर राजद नेते तेजस्वी स्वतः उपमुख्यमंत्री याव्यतिरिक्त गृह खाते स्वत सांभाळणार आहेत. नितीश कुमार गृहखातं नेहमी आपल्याकडे ठेवतात. पण, यावेळी सरकार स्थापनेच्या अटींमध्ये नितीश कुमारांना हे खातं तेजस्वी यादवांना (Tejashwi Yadav) द्यावं लागणार आहे. एवढेच नाही तर सभागृहात राजदचाच अध्यक्ष असेल हे देखील निश्चित आहे.
दरम्यान, नीतीश कुमार भाजपशी संबंध तोडून आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत नविन सरकार स्थापन करणार आहेत. अश्याच चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहेत. याचसोबत पटनामध्येच राहण्याचे आदेश आरजेडी आणि जेडीयू या दोन्ही पक्षांनी आपापल्या आमदारांना दिलेले आहेत.