
Ashwini Kedari Death | खेड तालुक्यातील पाळू गावची आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत २०२३ मध्ये मुलींमध्ये राज्यातून अव्वल ठरलेली अश्विनी केदारी हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन अवघ्या महाराष्ट्रात आपल्या मेहनतीच्या जोरावर नाव कमावणाऱ्या अश्विनीने ११ दिवस मृत्यूशी लढा दिल्यानंतर अखेर काल आपला शेवटचा श्वास घेतला.
२८ ऑगस्ट रोजी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात अश्विनी ८० टक्के भाजली होती. अभ्यासानंतर अंघोळीसाठी पाणी तापवत असताना, पाणी तपासण्यासाठी ती बाथरूममध्ये गेली. यावेळी अचानक हीटरचा जोरदार शॉक बसला आणि उकळते पाणी तिच्या अंगावर सांडले. गंभीर भाजल्यामुळे तिला तातडीने पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिच्या प्राणासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र अखेर ११ दिवसांनी ८ सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला.
अश्विनीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढत शिक्षण घेतले. शेतकरी पालकांच्या आशेचा किरण ठरलेली ही मुलगी PSI परीक्षेत अव्वल आल्याने गावकऱ्यांचा अभिमान वाढवणारी ठरली होती. तिच्या यशाच्या बातम्या नुकत्याच गाजत असतानाच हा अपघात आणि त्यानंतरचा मृत्यू गावासाठी, जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी धक्कादायक ठरला आहे.
करिअरच्या उंबरठ्यावर असताना उज्ज्वल भविष्य उभं करत असलेल्या अश्विनीची अचानक एक्झिट ही काळजाला चटका लावणारी आहे. तिच्या जाण्याने एक हुशार, जिद्दी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपलं आहे.