
मुंबई : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर (Harihareshwar) समुद्र किनाऱ्यावर मागच्या काही दिवसांपूर्वी संशयित बोट आढळली आहे. आता या बोटीचा पुढील तपास नवी मुंबईच्या एटीएस पथकाकडे देण्यात आलाय. या संदर्भात आता पुढील तपास ही टीम करणार आहे. १८ ऑगस्ट या दिवशी ही बोट हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर आढळून आली. महत्वाची बाब म्हणजे या बोटीमध्ये तीन एके ४७ रायफल आणि ६०० जिवंत काडतुसं सापडली आहेत.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील माहिती दिली. ते म्हणाले, “ही बोट एका ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची आहे. जून 2022 मध्ये बी बोट युरोपच्या दिशेने निघाली होती.पण मार्गात बिघाड झाला. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये बोटीवरील खलाशांना वाचवण्यात आलं मात्र बोटीचं टोइंग करण्यात अपयश आलं. हरिहरेश्वर येथे आलेली बोट, हीच बोट असल्याची माहिती समोर येत आहे. तपासयंत्रणेकडून बोटीसंदर्भात तपास सुरूच आहे”.
दरम्यान, या बोटीमध्ये 3 एके 47 रायफल्स आणि 600 जिवंत काडतुसं सापडली होती. त्यानंतर काल शुक्रवारी एटीएस पथकाने अधिक तपास केला. तपासादरम्यान बोटीमध्ये दोन तलवारी आणि चाकू देखील सापडले.